मोक्ष हि कल्पना नक्की काय आहे. मोक्ष म्हणजे सगळ्या सुख दुक्खातून पार, त्यानंतर काही मिळवायचे नाही काही हरवायचे नाही, तिकडे न सुरवात न अंत. खरच काय असेल मोक्ष? कोणालाच माहित नाही पण प्रत्येक जण मोक्ष मिळावा अस म्हणतो. आणि जर मोक्ष मिळाल्यावर आपण फसलो तर? आपल्या मोक्षाच्या कल्पना चुकीच्या असतील तर? मोक्ष मिळाल्यावर न अंत न आरंभ. म्हणून हि कविता कोणत्याही पूर्णविराम, स्वल्पविराम शिवाय लिहिली आहे. हि कविता एकाच दमात वाचायची आहे.
सोडून देह पोहचलो स्वर्गात
दिसला समोर दरवाजा बंद
दावून मजला जीवन माझे
विचारे देव पाहिजे काय
सांग निर्णय निवड एक
अल्याड जन्म पल्याड मोक्ष
जन्म मागता अड्कीन फेर्यात
पुनरपि जन्म पुनरपि मरण
कधी आनंद मिळवून काही
कधी दुख्ख हरवले काही
धावत रहाणे मिळवत रहाणे
मिळता काही परत धावणे
तीच तगमग तीच धडपड
परत देह प्रारब्ध परत
मागता मोक्ष होईन पार
जन्म मरण चक्र भेदून
नकोच आता असे धावणे
मोक्ष मजला त्वरित करावे
म्हणता उघडले मोक्षाचे द्वार
आनंदी झालो मोक्ष पावून
आत बघितले न्हवते काही
जाता आत उरलोच नाही
नाही कण नाही बिंदू
शुन्य केवळ बनलो एक
नाही दिवस नाही रात्र
नाही सूर्य नाही चंद्र
आकाश नाही जमीन नाही
नाही अंतर नाही वेळ
सत्त्य नाही असत्त्य नाही
सुरवात नाही अंत नाही
आता नाही मिळवणे काही
आता नाही हरवणे काही
हरले आता काळाचे भान
फिरतो आहे निरुद्देश केवळ
आता समजलो मनात माझ्या
जीवन जगणे म्हणजे खेळ
मृत्यू म्हणजे सुटका केवळ
नवीन जन्म नवीन खेळ
नाही मिळवणे नाही हरवणे
निरुद्देश आता इथेच फिरणे
नाही मरण नाही जीवन
उरलो आता केवळ शुन्य
आता नाही सुटका येथून
हाय फसलो मागून मोक्ष...
No comments:
Post a Comment