Tuesday, 28 February 2012

७ च्या आत घरात...


तसा हा जुनाट, अडगळीत गेलेला विचार. पण कालच एक अशी घटना आठवली कि मनात परत विचारचक्र चालू झाले. दोन महिन्यापूर्वी एका कॅ!ल सेंटरवरून रात्री ११ वाजता काम संपल्यानंतर घरी जाणाऱ्या युवतीवर तिच्याच सहकाऱ्यांनी पळवून नेऊन बलात्कार केला होता. त्यावेळी स्त्री सुरक्षेचा मुद्दा परत जोरदार चर्चिला गेला आणि थोड्या दिवसानंतर नेहमीसारखे कोणतीही कृती न होता ते वादळ परत शांत झाले.

सत्ययुगात रावणासारख्या राक्षसांपासून सीतेचे रक्षण करण्याकरिता आखलेली रेषा लक्ष्मण रेषा म्हणून ओळखली जाते. भारतीय संस्कृतीत, पालकांनी व कुटुंबीयांनी समाजातील महिलांचे पुरुष नावाच्या निशाचर श्वापदापासून  रक्षण करण्याकरिता आखलेली रेषा म्हणजे ७ च्या आत घरात. नवीन पिढीने आधुनिकतेच्या नावाखाली बऱ्याच जुन्या विचारांना व चालीरीताना छेद देऊन स्वताचे असे नियम आखले आहेत. यातील काही बदल त्यांना विनाशाकडे घेऊन जात आहेत. मुलीना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते यासाठी अडगळीत फेकलेली संकल्पना म्हणजे ७ च्या आत घरात....

स्त्री शिकली, कर्तुत्ववान झाली, स्त्री-पुरुष समानता आली, समाजही बदलला पण समाजाची मानसिकता खरोखरच बदलली का ? स्त्री आजही स्व-संरक्षण करू शकते का ? ती सुरक्षित आहे का ? तिला सर्वांकडून मनापासून सन्मानाची वागणूक मिळते का ? आधुनिक बदलांसाठी ती सुसज्ज आहे का ? दुर्दैवाने यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे नाही अशीच आहेत. 

आरक्षण आले, समानता आली, सर्व क्षेत्रात स्त्रियांनी आपला ठसा उमटविला असे काहीही असले तरी दिवसेंदिवस स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात वाढच होत आहे. कामाच्या ठिकाणी होणारी कुचंबना, कुचेष्टा, गर्दीचा फायदा घेऊन होणारे स्पर्श हे सर्व स्पष्ट करतात कि भारतीय समाज आजही स्त्रियांकडे फक्त "चूल नि मुल " व "भोगाची वस्तू " याच दृष्टीकोनातून बघतो आहे. भीती, लाज, संकोच, बदनामी यामुळे स्त्रिया तक्रार करत नाहीत याचाच गैरफायदा अनेकजण घेतात.

संसाराचा गाडा चालविण्यासाठी   काम तर करावे लागणार व अशा गोष्टी घरी सांगितल्या तर त्यावरही गदा येणार अशा दुहेरी कात्रीत भारतीय स्त्री सापडली आहे. स्त्रियांच्या असहायतेपनाची, दडपणाची, भीतीची मजा घेण्याची विकृती वाढत आहे. रस्त्यावरून जाताना, प्रवासात छेडछाड करण्याचे प्रमाण वाढले आहे. कामाच्या ठिकाणी होणारे अन्याय, खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका, प्रवासातील त्रास हे सर्व मनावर दगड ठेऊन सहन करण्याशिवाय तिच्यावर पर्यायच नाही. पण अजून किती दिवस हे सहन करायचे ??

स्त्रीला तीच स्त्रीत्व जपता आलाच पाहिजे. याकरिता त्यांनी स्वताची हिम्मत वाढवावी. जिथल्या तिथे जाब विचारल्याशिवाय अशा अपप्रवृत्ती थांबणार नाही. स्त्री सक्षम होण्यासाठी पालकांनीही संवेदनशील होण्याची गरज आहे. मुलीनी आपल्या मित्र-मैत्रीणीविषयी, ऑफिसमधील सहकाऱ्यांविषयी घरी माहिती द्यावी. आपल्या अडचणी, होणारे खर्च याविषयी मोकळेपणाने बोला. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घरी वेळेवर या.

प्रगतीसाठी पूर्ण स्वातंत्र्य हवे पण यातील काही मार्ग विनाशाकडे घेऊन जाणारे नकोत. जाचक  अटी, स्वातंत्र्यावर घाला अशा गोष्टी मनातून काढून टाकायला हव्यात. उलट सभ्य रावनांपासून सुरक्षित राहण्यासाठी हे सर्व काटेकोरपणे अमलात आणले पाहिजे. शेवटी, तंत्रज्ञान किठी प्रगत झाले तरी तडा गेलेय काचेला ते पूर्वीचे वैभव प्राप्त करून देऊ शकत नाही. 

No comments:

Post a Comment