Tuesday, 28 February 2012

वर्तमानपत्र वाचून तुमच मन कधी सुन्न झालंय का ? नाही ना...कसे होणार..


वर्तमानपत्र वाचून तुमच मन कधी सुन्न झालंय का ? नाही ना...कसे होणार..

रोजच खून, दरोडा, अपहरण, बलात्कार, भ्रष्टाचार, राजकारण, धमक्या, निषेध यांची इतकी सवय झाली आहे कि ते आता अंगवळणी पडलंय. आपली विवेकबुद्धी जागृत आहे पण भावनांना गंज चढलाय. प्रसार माध्यमांचे काम फक्त जाहिराती देणे, शहानिशा न करिता अफवा पसरविणे, बातम्या रंगवून आगीत तेल ओतणे इथपर्यंतच मर्यादित राहिले आहे.

टिळकांनी ज्यावेळी समाजप्रबोधन व सामाजिक जागृतीसाठी केसरी नियतकालिक सुरु केले होते, तेव्हा त्यांनी ठरविलेली ध्येय व उद्दिष्टे यांना आजच्या माध्यमांनी पूर्णपणे तिलांजली दिली आहे. वर्तमानपत्र हे चांगल्या विचारांचे व बालमनावर संस्कार करणारे प्रभावी साधन म्हणून पाहण्याचे दिवस आता गेलेत. बलात्कार किंवा अत्याचारांच्या घटना इतक्या रंगवून सांगितल्या जातात कि, अशा लोकांना जिवंतपणीच नरकयातना सहन कराव्या लागतात. देशात ज्यावेळी जातीय दंगले किंवा जमावाकडून हिंसक कृत्य होतात त्यावेळी माध्यमांकडून अतिशय भडक वर्णन करून याला खतपाणीच दिले जाते. मग दंगल/दुशकृत्ये करणाऱ्या इतकच त्यांना खतपाणी घालणारी प्रसारमाध्यमेही जबाबदार नाहीत का ?

कायद्याने माध्यमांवर सरकारचे नियंत्रण आहे. पण सरकार कुणाचे नि मध्यम कुणाचे. संगमताने एकमेकांच्या डोक्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. काही दिवसांपूर्वीचे एक उदाहरण देतो. नारायण राणेंनी राष्ट्रवादीचे वस्त्रहरण करण्याची बातमी पुढारीमध्ये मुख्य बातमी होती तर सकाळमध्ये एका कोपऱ्यात होती तर आनंद परांजपेच्या राष्ट्रवादी प्रवेशाची बातमी सकाळमध्ये मुख्य बातमी होती तर पुढारीमध्ये कोपऱ्यात होती. थोडक्यात काय, प्रत्येक वर्तमानपत्राने एका मोठ्या राजकीय पक्षाला हाताशी धरले आहे. जणू कुत्र्याला मांजर साक्षी.

सामान्य जनतेचे प्रश्न मांडणे, सरकारच्या धोरणातील चुका दाखवून देणे, लोकांसमोर नीतिमत्तेचा आदर्श उभा करणे अशी विधायक कार्य सर्वजन विसरूनच गेली आहेत. या देशात सामान्य माणसाचा आवाज दाबला जाऊ शकतो परंतु माध्यमांचा नाही. अशावेळी माध्यमांकडून अतिशय जबाबदारीने  परिस्थिती  हाताळण्याची आवश्यकता असताना त्यांनीच असे बेजाबदार वर्तन केले तर सामान्य जनतेने कोणाकडे आशेने बघायचे ?

मध्यंतरी सुरेश कलमाडी तिहारमधून सुटलेली बातमी किंवा  ए. के. राजाना जमीन मिळाल्याची बातमी सर्वच माध्यमांनी Breaking News म्हणून प्रसिध्द केली परंतु त्याचवेळी विदर्भातील शेतकरी मरत असताना त्याची कोणी साधी दखलही  घेतली नाही यापेक्षा जास्त विरोधाभास कोणता ? काही दिवसापूर्वी एका जेष्ठ पत्रकाराने खंत व्यक्त केली कि, आज कालच्या पिढीला वाचनाची आवड नाही.  अतिशय खालच्या दर्जाचे लिखाण रोज माथी वाचल्यावर कोण आवडीने वाचेल ?

पत्रकारांनी जर स्वताच्या चौकटीत राहून योग्य लिखाण केले तर त्यांच्यावर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायद्याची आवश्यकता भासणार नाही. देशातील जनतेला कोणता संदेश द्यायचा व तरुण पिढीवर काय बिंबवायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. नाहीतर जनतेकडे पर्याय आहेच, कचऱ्याच्या डब्यात तुमची जागा दाखविण्याचा.

No comments:

Post a Comment